मुंबई – मोदी मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार २० जूननंतर करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या संबंधीची जोरदार चर्चा राजधानीत तसेच महाराष्ट्रातही सुरू असून या मंत्रीमंडळ विस्तारात किमान दोन मंत्रीपदे आपल्या वाट्याला यावीत यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली असल्याचेही समजते.त्यातही मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त असलेले ग्रामीण विकास मंत्रालय मिळावे यासाठी सेना नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मंत्रीमंडळ विस्तारात दोन मंत्रीपदांसाठी सेना आग्रही
शिवसेनेच्या अनंत गिते यांना अवजड उद्योग मंत्रालय सोपविले गेल्यानंतर सेना नेत्यांनी त्याविरोधात नाराजी प्रकट केली होती. त्यावर मंत्रीमंडळ विस्तारात अधिक संधी दिली जाईल असे खुद्द पंतप्रधानांनी सेना नेत्यांना सांगितले होते. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात किमान १ कॅबिनेट व १ राज्यमंत्रीपद मिळावे यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्रामीण विकास मंत्रालय मिळावे यासाठी सेना नेते मोदींवर दबाव आणत आहेत मात्र मोदींनी त्यासंदर्भात कोणताच संकेत सेना नेत्यांना दिलेला नाही.
सेनेने ग्रामीण विकास नाही तर उर्जा मंत्रालय मिळावे यासाठीही प्रयत्न चालविले असून चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव आढळराव पाटील, भावना गवळी आणि संजय राऊत यांनी नांवे चर्चेत आहेत. गिते यांनाही अवजड उद्योगांऐवजी पर्यावरण, वन मंत्रालय किवा कामगार मंत्रालय मिळावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे समजते.