
इस्लामाबाद – भारताविरोधात नेहमीच गरळ ओकणारा जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने पाकिस्तानातील कराची विमानतळावर झालेल्या हल्ल्यासाठी नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवल आहे.त्याने म्हटले आहे ,तसेच यामागे मोदींचे सुरक्षा पथकच असल्याचे सईदने ट्विट केले आहे.
कराची हल्ल्यामागे मोदी;दहशतवाद्यांची गरळ
पाकिस्तानातील कराची येथे जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री उशीरा १० ते १५ सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांसह २३ जण मृत्युमुखी पडले असून मृतांचा आकडा अधिक असावा असे सांगितले जात आहे. ठार झालेल्यात १० दहशतवाद्यांचाही समावेश आहे. या विमानतळावरच्या जुन्या टर्मिनलमध्ये विमानतळ सुरक्षा रक्षकांच्या पोषाखात असलेले दहशतवादी घुसले आणि त्यानी तेथेच अंदाधुंद गोळीबार सुरू केला असे समजते. या दहशतवाद्यांजवळ स्फोटकेही होती.
विमानतळाच्या फोकर इमारतीत दहशतवादी घुसल्याचे समजतात तातडीने लष्कराला बोलावण्यात आले आले तसेच पोलिसही हजर झाले. पोलिस आणि लष्करी जवानांनी दहशतवादी लपलेल्या इमारतीला गराडा घातला. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात १० दहशतवादी मारले गेले तर एका पोलिस अधिकार्यासह कांही जवान ठार झाले. एक दहशतवादी अंगावर बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट करून ठार झाला.हाफिज सईदने आज पहाटे ट्विट केले त्यात त्याने म्हटले आहे,पाक सरकारने भारतासोबतची भेटींची देवाणघेवाण थांबवावी, असा इशाराही दिला आहे. त्याचप्रमाणे, कराचीतील हल्ला हा मोदींचाच कट असल्याचा आरोप जमात उद दावाच्या ट्विटर अकाउंटवरूनही करण्यात आला आहे .दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने स्वीकारली आहे. परंतु, पाकमधील काही भारतद्वेष्ट्या दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवून भारत-पाक संबंधांमध्ये तणाव निर्माण करायचा चंगच बांधलेला दिसतोय. त्यात जमात उद दावा आघाडीवर आहे.
