कोलंबो- गेले कांही दिवस सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीलंकेच्या कांही जिल्हयात २६ हजार कुटुंबांवर संकट कोसळले असून त्याचा फटका १ लाख नागरिकांना बसला आहे. शुक्रवारी दुपारपासून पुन्हा पावसाने जोर पकडल्याने ठिकठिकाणी पूर आले आहेत. अनेक ठिकाणी जमीनी खचल्या आहेत. यात २३ जण ठार झाले आहेत तर १ नागरिक बेपत्ता आहे.
श्रीलंकेचे आपत्कालीन व्यवस्था मंत्री महिद्र अमरवीरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जिल्ह्यातील ४० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली आहेत तर शेकडो घरांचे बरेच नुकसान झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका कालुतारा जिल्हयाला बसला आहे. येथे मरण पावलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. मदत कार्य वेगाने सुरू असून मृतांच्या नातेवाईकांना सरकारने १५ हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.