राज गर्जना – विधानसभेत ‘चमत्कार’,निवडणूक स्वतःलढणार !

raj
मुंबई – लोकसभेच्या पराभवाने मी खचून गेलेलो नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मी नक्कीच मुसंडी मारून दाखवेन असा विश्वास व्यक्त करतानाच मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वतः लढणार असून महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला तर राज्याचे नेतृत्व करण्याची तयारी आहे असे ठाम प्रतिपादन केले.

लोकसभा निवडणुकांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेला सामोरे गेले. यावेळी त्यांनी देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन केले. कोणत्याही कुबड्यांचा आधार न घेता बहुमताने सरकार स्थापन केल्याबद्दल राज यांनी नरेंद्र मोदींचे कौतूक केले. तसेच आपण थेट जनतेसमोर येण्याचा पर्याय निवडल्याचे सांगितले. यावेळी लोकसभेतील विजयाचे श्रेय हे दुसऱ्या- तिसऱ्या कोणाचे नसून हे यश फक्त नरेंद्र मोदींचेच असल्याचे राज यांनी निक्षून सांगितले.आणि सेनेच्या यशावर अप्रत्यक्ष तोफही डागली.

लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे वर्णन करताना मात्र राज यांनी विरोधी पक्ष कधी जिंकत नसतात, तर सत्ताधारी हरत असतात असेच केले. यावेळी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तोफ डागताना राहुल गांधी हे महात्मा गांधी यांचे सच्चे अनुयायी आहेत. त्यांनी गांधींचा संदेश बरोबर पकडला. कॉंग्रेसले संपविली, असा जोरदार हल्लाही राज ठाकरे यांनी कॉंग्रेसवर केला. ते म्हणाले महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी राहुल गांधी यांना महात्मा गांधींच्या संदेशाचा अर्थ उमगला व त्यांनी खऱ्या अर्थाने निवडणुकीत हा संदेश प्रत्यक्षात आणल्याचे सांगत राहुल गांधींची खिल्लीही त्यांनी उडविली.

लोकसभेच्या पराभवाने मी खचून गेलेलो नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मी नक्कीच मुसंडी मारून दाखवेन,तुम्हाला चमत्कारही दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आणि ‘या मला तुमच्याशी काही बोलायचे ‘ या विनंतीवजा जाहिरातीतील ‘काही ‘ या शब्दाचा अर्थ नमूद करताना मी स्वतःच विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यासाठी ती जाहिरात होती असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्यांचे अभिनंदन करून राज ठाकरे म्हणाले . राज्यात मोदी लाट होती. वातावरण वेगळे होते. याची जाणिव आधीच झाली होती. केवळ मोदी लाटेमुळे महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपचे खासदार निवडून आले. यात कोणत्याही पक्षाचे यश नाही की अपयश नाही. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवासाठी राज यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी राज यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानीचा प्रश्न उपस्थित केला. आणि आगामी काळात पक्षाच्या आदेशाशिवाय कोणतेही मनसे स्टाईल आंदोलन न करण्याचा इशाराही राज ठाकरे यांनी सभेत दिला.

Leave a Comment