कॉंग्रेसमध्ये ‘बदला’चे वारे? ‘सीएम’सह तीन मंत्री दिल्ली दरबारात

chavan_30
मुंबई – नरेंद्र मोदींच्या लाटेने ‘होत्याचे नव्हते ‘झाल्याने कॉंग्रेसच्या वर्तुळात आता चिंतनापेक्षा पक्षांतर्गत ‘बदला’ घेण्याचे राजकारण उफाळले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री हटावसाठी एकवटलेल्या मंत्र्यांनी एकीची मोट बांधली असली तरी ‘सीएम’पदासाठी त्यांच्यातही चुरस वाढली आहे.त्यात उद्या राज्यमंत्रीमंडळात फेरबदल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत ‘हायकमांड’ला भेटण्यास गेले असले तरी तीन दिग्गज नेतेही दिल्ली दरबारी हजर झाले आहेत,परिणामी राज्यात कॉंग्रेसमध्ये ‘बदला’चे वारे सुरु झाल्याची चर्चा रंगत आहे.

राज्यातील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर नेतृत्व बदलाची मागणी पुढे आली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपली बाजू मांडली.आपल्या भवितव्याचा निर्णय दिल्लीच घेईल,अशी भूमिका पराभवानंतर मांडणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली.त्यात आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांनी देऊ केलेला राजीनामा सोनियांनी फेटाळून लावला होता. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण हे काहीसे बिनधास्त झाले आहेत . मात्र मुख्यमंत्र्यांच्यापाठोपाठ नारायण राणे,पतंगराव कदम यांच्यासह काही मंत्रीही दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत .त्यामुळे राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल होतो का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या दृष्टीने राज्य विधानसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या असल्याने पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांकडून योजण्यात येणाऱ्या उपायांची माहिती जाणून घेतल्याची चर्चा आहे.राज्याची सत्ता कायम राखण्यासाटी नेतृत्व बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री विरोधकांकडून केली जात आहे. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नारायण राणे, डॉ. पतंगराव कदम, नितीन राऊत आदी काही मंत्रीही दिल्लीत दाखल झाले आहेत.मात्र काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर संघटनात्मक बदल केले जातील, असे पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment