मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुमचे किती -आमचे किती यावरून महायुतीत जागा वाटपाचा तिढा आतापासूनच गुंतागुंतीचा बनलेला असताना कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीतही जागांच्या ‘वजाबाकी’वरून बिघाडीचा धूर निघण्यास प्रारंभ झाला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत.
मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कमी जागा आल्या होत्या, यामुळे काँग्रेसने विधानसभेत राष्ट्रवादीला कमी जागा दिल्या होत्या. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे वाटाघाटीच्या वेळी हा भाग लक्षात घ्यावा अशा सुचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परिणामी राज्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली आहे. स्थानिक पातळीपासुन राज्यस्तरीय संघटनेत नविन लोकांना संधी द्या. विधानसभा निवडणुकांच्या वाटाघाटी लवकरात लवकर पुर्ण करा आणि नव्या चेह-यांना संधी द्या. लोकांना बदल हवा आहे. अशा सुचनाही पवारांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.त्यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला किती जागा हव्या याबाबत पवारांनी थेट भाष्य केले नसले तरी जुने दाखले देत जशास -तसेचा पवित्रा घेण्याचे सुचविले आहे.