राज्यात १९ जागांसाठी आज मतदान

मुंबई – महाराष्ट्रात उद्या [दि. २ ४ ]गुरुवारी तिस-या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे . मतदारराजा एकूण ३३८ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहे.त्यात दिग्गजांचे काय होते आणि नव्याने कुणाचा संसदेत प्रवेश होतो ,हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असले तरी मतदानाची टक्केवारी महत्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रातील एकूण १९ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून, यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाच समावेश आहे.  राज्यात पहिल्या दोन टप्प्यात मतदारांनी उत्साहाने मतदान केले होते. मुंबईतील याआधीची मतदानाची आकडेवारी फारशी उत्साहवर्धक नाही. पण संपूर्ण देशातच मतदानाची टक्केवारी वाढल्याने यंदा मुंबईत वेगळे चित्र पहायला मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

३३८ उमेदवारांमध्ये १४९ अपक्ष असून, यामध्ये २६ महिला आहेत. उद्या अखेरच्या टप्प्यात ३,१७,३९,४४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये १,७०,२०,३८३ पुरुष आणि १,४६,२२,७१३ महिला आहेत. तिस-या टप्प्यात भाजपचे ११, शिवसेनेचे ८, काँग्रेसचे १०, राष्ट्रवादीचे ८, मनसेचे सात, सीपीआयचे दोन, सीपीएमचे तीन आणि बसपचे १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.आणि ते नशीब आजमवणार आहेत. राज्यात एकूण ३४,३४३ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. राज्यात तिस-या आणि अंतिम टप्प्यात मुंबईतील सहा, ठाणे जिल्ह्यातील चार यासह रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी आणि नाशिक या मतदारसंघात मतदान होणार आहे.