रायगड: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वागण्यात बराच फरक पडला आहे. त्यामुळे त्यांची मनमानीदेखील वाढली आहे. सत्तेची झिंग त्यांना चढली असून त्यामुळे त्यांना आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीत त्यांना जागा दाखवून देण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही जर पुन्हा आघाडीला निवडून दिले तर अजित पवारांच्या मस्तीत आणखीनच भर पडेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
रायगडमध्ये शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी आयोजीत करण्याात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी येथील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या प्रचारसभेकडे कोकणातील सेनेचे नेते रामदास कदम यांनी पाठ फिरवली.
गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम हे येथील उमेदवार अनंत गीते यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे कदम यांनी आागमी काळात आपण गीते यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे उध्दव ठाकरे हे सभेप्रसंगी कदम यांची समजूत काढतील असे वाटले होते. पण त्यात उद्धव ठाकरेंना यश आले नाही हेच आजच्या त्यांच्या गैरहजेरीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता कदम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.