भुवनेश्वर- जय किसान महासंमेलनात बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसरा स्वतंत्रता संग्राम सुरू केल्याचे जाहीर केले आहे. अण्णा यावेळी म्हणाले की २०२४ पर्यंत संसदेत किमान १०० ते १२५ शेतकरी खासदार म्हणून गेल्याचे पाहण्याची त्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तरूणांनी पुढे यायला हवे. २०१४ च्या निवडणुकीत ते शक्य नाही मात्र आपले ध्येय गाठण्यासाठी १० वर्षांचा अवधी पुरेसा असल्याचेही अण्णा यावेळी म्हणाले.
सरकारच्या अर्थिक नितीवर टीका करताना अण्णा म्हणाले की सरकारने गांव हे विकासाचे केंद्र बनविले असते तर आज भारत वेगळा दिसला असता. मात्र सरकारने शहरे आणि कार्पोरेटचाच विकास केला आहे. दिल्लीत बसलेल्यांना ग्रामीण जनतेसाठीचे निर्णय घेण्याची परवानगी असता कामा नये. आजच्या तोडा आणि फोडा राजकारणाचा उबग आला आहे. ते बदलायचे असेल तर तरूणांनीच पुढे यायला हवे. मतदानात नकाराधिकार मिळाला आहे. योग्य उमेदवार नसेल तर हा अधिकार वापरून निवडणुक रद्द करायला हवी.