औरंगाबाद- लोकसभा निवडणूकीसाठी औरंगाबाद मतदार संघातून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला सक्षम उमेदवार मिळत नसल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात दोन्हीत पक्षांतील नेत्यांमध्ये चर्चा होऊन सोमवारी किंवा मंगळवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या् विरोधात उभे राहण्यासस शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर फारसे तगडे पर्याय शिल्लक राहिलेले नाहीत. माजी खासदार उत्तमसिंग पवार आणि माजी आमदार नितीन पाटील यांची नावे चर्चेत असली तरी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही अनुकूलता अद्यापही दिसलेली नाही. शिवसेनेच खासदार चंद्रकांत खैरे हे या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. त्यांना रोखण्यासाठी काँग्रेसला प्रबळ उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला औरंगाबादची जागा सोडण्याविषयी चर्चा सुरू आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीने खळबळ उडवून देणा-या शांतीगिरी महाराज यांना दिलेली आश्वासने काँग्रेस पक्षाने पाळलेली नाहीत. त्यामुळे शांतीगिरी महाराज नाराज झालेले आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर तगडा उमेदवार उभा करता येत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडण्याची चर्चा आता होऊ लागली आहेत, मात्र या संदर्भात अधिकृत बोलण्यास कोणी तयार नाही. हातकंणगलेच्या धर्तीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण यांच्या सारखा तगडा उमेदवार निवडणुकीत उभा राहू शकतो, अशीही माहिती या सूत्रांनी दिली. त्याामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील हालचालीना वेग आला आहे. त्यामुळे आता उमेदवार कोण असणार यांची चर्चा रंगली आहे.