मुंबई – मुंबईतील शक्ती मिलमध्ये महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कर प्रकरणी पाचही आरोपींना मुंबई सेशन कोर्टाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील देखील उपस्थित होते. गेल्या वर्षी छायाचित्रकार महिला शक्ती मिलमध्ये कामानिमीत्त गेली असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर आणखी एका महिलेने तिच्यावरही शक्ती मिलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती, या दोन्ही प्रकरणांमधील आरोपी एकच होते.
आज झालेल्या सुनावणीत दोन्ही सामुहिक बलात्काराच्या घटनांमध्ये कोर्टाने आरोपींना दोषी ठरविले आहे. शुक्रवारी त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार असून कदिचित त्याच दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. शक्ती मिलमध्ये बलात्काराच्या दोन घटना घडल्या होत्या. पहिली घटना गेल्या वर्षी 31 जुलै रोजी ऑपरेटर तरुणीवर सामूहिक बलात्काराची होती. तर, दुसरी घटना 22 ऑगस्ट रोजी घडली होती. एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी, सिराज रहमान अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही प्रकरणात पीडितेच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली.
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचही आरोपींना दोषी ठरविण्यात आल्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केली. कोर्ट काय निर्णय देते हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्री पाटील आज कोर्टात उपस्थित होते. ते म्हणाले, या निर्णयामुळे यापुढे असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही. मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षीत आहे. महिलांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. गेल्या वर्षी 22 ऑगस्ट रोजी एका इंग्रजी मासिकाच्या छायाचित्रकार तरुणीवर पाच नराधमांनी वरळीतील शक्ती मिलच्या आवारात सामूहिक अत्याचार केला होता.
बातमीसाठीची छायाचित्रे काढण्यासाठी 22 वर्षीय वृत्तछायाचित्रकार पुरुष सहका-यासोबत मिलच्या परिसरात गेली होती. तिच्या सहका-याला बांधून पाच नराधमांनी मिलमधील ओसाड जागी तिच्यावर अत्याचार केले होते. या घटनेची माहिती फोनद्वारे ना. म. जोशी मार्ग पोलिसांना देण्यात आली, मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नराधम पसार झाले होते. मात्र, त्यांना तातडीने पकडून त्यांच्याविरोधात ठोस पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.