मिरपूर- बांगलादेश येथे खेळल्या जात असलेल्या अशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्याने फायनल गाठण्याचे आव्हान बिकट बनले आहे. टीम इंडियाला आता पाकिस्तानचा बांगलादेशने पराभव करावा यासाठी वाट पहावी लागणार आहे. त्याशिवाय आगामी काळात अफगाणिस्तानविरुद्ध बुधवारी होणा-या लढतीत टीम इंडियाला बोनस गुणाने विजय नोंदवावा लागेल. ही सर्व गणिते पाहता भारताला अंतिम फेरी गाठणे सोपे नाही.
याबाबत बोलताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हाणाला, ‘अंतिम फेरीचा विचार न करता अफगाणिस्तानविरुद्ध बोनस गुणाने विजय मिळवण्याचेच ध्येय ठेवल्याचे म्हटले. अन्य लढतींचा विचार न करता फक्त भारताच्याच लढतीचा विचार करणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध बोनस गुणाने विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आता खेळ सुधारण्याचा आणि चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रत्येक सामन्यात होणा-या तीन ते चार चुका आमच्या निकालावर परिणाम करत आहेत. अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून राहण्याचा अनुभव याआधीही घेतला आहे ’.
याबाबत बोलताना टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कार म्हणाले, ‘भारताची तयारी अतिशय खराब असल्याचे त्यांच्या कामगिरीवरुन दिसत आहे. संघ व्यवस्थित सराव करत नसल्याचे यानिमित्ताने दिसले. सरावाला पर्याय असूच शकत नाही. पर्यायी सराव ही संकल्पनाच हद्दपार करणे गरजेचे आहे. हा नियम फक्त आशिया चषकापुरताच नाही तर सर्व स्पर्धाना लागू करायला हवा.’