पराभवामुळे धक्का बसला नाही- कोहली

ढाका- रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या अटातटीच्या लढतीत टीम इंडियाचा पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या प्रशंसकात चिंतेचे वातवरण आहे. मात्र या पराभवामुळे अजिबात धक्का बसला नसून उलट संघात अनुभवाची कमतरता असूनही संघाने दाखविलेल्या सांघिक कामगिरीने प्रभावित झाल्याचे मत कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रीया देताना व्यक्त केले.

या पराभवाबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘पाकिस्तान विरुद्धच्या अटातटीच्यात लढतीतल्या पराभवाचा मला अजिबात धक्का बसलेला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाऊ शकलो यावर मी प्रभावित झालो आहे. संघातील प्रत्येक जण उत्तम कामगिरी करत आहे. पाकिस्तान संघात अनुभवी फलंदाज असूनही भारतीय गोलंदाजांनी अनुभवाची कमतरता असूनही कडवे आव्हान दिले.’

यावेळी त्याने अमित मिश्राच्या गोलंदाजीची प्रशंसाही केली. आशिया चषकात गेल्या दोन सामन्यांत श्रीलंका आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आशिया चषकात अपयशाची टांगती तलवार टीम इंडिया संघावर आहे.

Leave a Comment