मुंबई- मुंबई हायकोर्टाने करवीरकरांना मोठा दिलासा दिला आहे. कोल्हापूरच्या टोल वसुलीला आज (गुरुवारी) स्थगिती दिली आहे. कोल्हापुरातील रस्ते पूर्ण झाल्याचा आयडीयल रोड बिल्डर्स प्रा. लिचा (आयआरबी) दावा हायकोर्टाने साफ चुकीचा ठरवला आहे. कोर्टाच्या निर्णयाचे टोलवसुलीविरोधात जनआंदोलन उभारणार्या कोल्हापुरकरांनी स्वागत केले असून फटाके वाजवून आनंद साजरा केला आहे.
न्या. अभय ओक, न्या. एम.व्ही.सोनक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. कोल्हापुरातील टोलवसुलीविरोधात कॉम्रेड सुभाष वाणी, अॅड. अमर नाईक, शिवाजीराव परुळेकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अभय नेवगी यांनी युक्तिवाद केला. आयआरबी कंपनीने रस्त्यांचे काम कराराप्रमाणे केलेले नाही, असा युक्तिवाद कोल्हापूर महापालिकेचे वकील अॅड. पटवर्धन यांनी कोर्टात केला.