विदर्भाच्या सिंचनाचे 1,402 कोटी परत करा – राज्यपाल

मुंबई – सिंचन घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या सरकारला राज्याचे राज्यपाल के. शंकरनारायण यांनी सणसणीत चपराक लगावली आहे. विदर्भाच्या सिंचनाचे अन्यत्र वळवलेले 1402 कोटी रुपये विदर्भाला परत करा, असे लेखी निर्देश राज्यपालांनी राज्य सरकारला दिले आहे. विदर्भ सिंचन महामंडळाच्या तक्रारीनंतर राज्यपालांनी सिंचनाच्या जमा-खचार्ची तपासणी केली आहे. तपासणीत राज्यपालांच्या पुर्वपरवानगी शिवाय विदर्भाच्या सिंचनाचे पैसै दुसरीकडे वळवल्याचे उघड झाले.

2008-2012 या काळात विदर्भाच्या सिंचनाचे 1,171 कोटी रुपये पश्चिम महाराष्ट्राकडे, तर 231 कोटी 45 लाख रुपये मराठवाड्याच्या सिंचनासाठी वळवले गेले. विदर्भ सिंचनाचे एकूण 1,402 कोटी रुपये वळवल्याचा ठपका आहे. अशा प्रकारे पुढच्या 3 वर्षात दरवर्षी 467 कोटी 41 लाख या प्रमाणे सर्व 1402 कोटी रुपये विदर्भ परत करण्याचे निर्देश राज्यपालांनी राज्य सरकारला दिले आहे.