कोहलीची ‘विराट’ खेळी, भारताचा ‘शानदार’ विजय

मीरपूर – कर्णधार विरोट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने आशिय चषक क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. बांगलादेशविरुद्ध बुधवारी झालेल्या साखळी सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत बांगलादेशने भारतापुढे विजयासाठी २८० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले. विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करुन दिली.

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. मात्र भारताची ही सलामीची जोडी झटपट बाद झाली. धवन २८ तर शर्मा २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली यांनी तिस-या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारी केली. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील १९वे शतक झळकावले. कर्णधार म्हणून आणि बांगलादेशविरुद्धचे हे त्याचे तिसरे शतक ठरले. रहाणेने ७३ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात थोडी अडखळत झाली.

बांगलादेशच्या १६ धावा झाल्या तेव्हा शमसूर शामीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याला अवघ्या सात धावा करता आल्या. त्यानंतर आलेल्या मोमिनुल हकही २३ धावांकरुन अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. एका बाजूने अनामुल हकने एकाकी झुंज देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचाही अडसर अ‍ॅरोनने दूर केला. बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुर रहिम याने ११७ धावांची तडाखेबाज खेळी करत बांगलादेशचा डाव अडीचशे पार नेला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही भारतीय गोलंदाज विशेष कामगिरी दाखवू शकले नाही. भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक चार बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार, वरुण अ‍ॅरोन आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.