आयपीएलमध्ये महाराष्ट्रातील रणजी खेळाडूची उपेक्षा

मुंबई- महाराष्ट्र संघाकडून रणजी स्पर्धेसाठी खेळाणा-या खेळाडूंना यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत स्थामन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आयपीएलवाल्याडनी त्यांची आशा फोल ठरवीत निराशाच केली आहे. रणजी स्पर्धेतील महाराष्ट्राच्या खेळाडूंची आयपीएलवाल्यानी उपेक्षाच केली आहे. या संघातील केदार जाधव व विजय झोल या दोन खेळाडूंचा अपवाद वगळता महाराष्ट्र संघातील अन्य गुणवान खेळाडूंना यंदाच्या आयपीएलच्या संघात संधी मिळाली नाही.

दिल्ली डेअरडेव्हिल्सने यंदाच्या रणजी सामन्यावसह स्थानिक स्पर्धामध्ये सर्वाधिक धावा करणा-या केदारला दोन कोटी रुपयांचे मानधनावर आपल्याकडेच राखले आहे. १९ वर्षांखालील गटाच्या आशिया चषक स्पर्धेत भारतास विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार विजय झोल याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने तीस लाख रुपयांची बोली लावत विकत घेतले आहे. या दोन खेळाडूंचा अपवाद वगळता महाराष्ट्र संघातील अन्य गुणवान खेळाडूंना कुठल्याच संघात स्थान मिळाले नसल्याने त्यांची निराशाच झाली आहे.

महराष्ट्राकडून खेळत असलेला अंकित बावणे याने यंदाच्या मोसमात सातत्याने खेळ करीत सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर हर्षद खडीवाले याने यंदाच्या मोसमात ५९ धावांचे सरासरीने एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने यंदा एक द्विशतक व एक शतक टोलविले होते. बावणे व खडीवाले हे बदली गोलंदाज म्हणूनही अनेक वेळा यशस्वी ठरले आहेत. समाद फल्लाह या वेगवान गोलंदाजाने यंदाच्या मोसमात ३७ बळी घेतले आहेत. एकाच सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरीही केली आहे.

त्याशिवाय द्रुतगती गोलंदाज श्रीकांत मुंढे यानेही यंदा प्रभावी गोलंदाजी करीत ३४ बळी घेतले आहेत. अनुपम संकलेचा यानेही यंदा एकोणतीस विकेट्स घेतल्या आहेत.अक्षय दरेकर या फिरकी गोलंदाजाने यंदा तीस गडी बाद केले आहेत. एका सामन्यात दहा बळी घेण्याची किमयाही त्याने केली आहे. तर दुसरीकडे रणजी विजेत्या कर्नाटक संघाचा कर्णधार आर. विनयकुमार, रॉबिन उथप्पा, लोकेश राहुल, मनीष पांडे, करुण नायर, चिदंबरम गौतम, मयांक अगरवाल यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रणजी खेळाडू मात्र अपयशी ठरले आहेत.

Leave a Comment