गृहमंत्री पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

कोल्हापूर – गृहखात्याने वसगडे येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मरण पावलेला शेतकरी चंद्रकांत नलवडेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी १५ फेब्रुवारी रोजी कोल्हा पूर जिल्ह्यातील १० तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यालशिवाय आगामी काळात त्यालच मागणीसाठी न्यायालयात जाण्याची तयारी संघटनेने केली आहे.

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रदेश प्रवक्ते महेश खराडे, युवा जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा, बी.जी.पाटील, सयाजीराव मोरे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक पार पडली. दोन वर्षांपूर्वी आंदोलनात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी मोहन पवार यांचा नुकताच मृत्यू झाला. आंदोलनानंतर काही काळ ते पोलीस सेवेतही कार्यरत होते. असे असताना घटना घडली त्यादिवशी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये असताना त्यांना जबाबदार धरून खुनाचा गुन्हा दाखल होत असेल तर वसगडे येथे चंद्रकांत नलवडे यांचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याप्रकरणी गृहमंत्रालयाचे प्रमुख म्हणून गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर सुद्धा खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यारत आली.

१२ नोव्हेंबर २०१२ रोजी आंदोलनावेळी पोलीस गोळीबारात चंद्रकांत नलवडे याचा मृत्यू झाला होता. याची दंडाधिकारीय चौकशी अद्याप सुरू आहे. राजू शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा ओढूनताणून दाखल केल्याबद्दल संघटनेच्यावतीने तासगांव येथे गृहमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. मात्र, या घटनेची प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे तासगांव बंद करून एस.टीवर दगडफेक केली. याप्रकरणी सुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करावेत. नुकसानीची भरपाई पदाधिका-याकडून वसूल करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Leave a Comment