मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका

नवी दिल्ली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय पक्षाची मान्यता रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली आहे.

दिल्लीतील निखिलेश पांडे या वकिलाने ही याचिका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पु्ण्यात डोकी भडकवणारे प्रक्षोभक भाषण केले. राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरुन राज्यातील टोल प्रकरणी येत्या १२ तारखेला राज्यव्यापी रास्ता रोको करणार असल्याचा आणि हिंमत असेल तर अटक करुन दाखवाच, अशाप्रकारची सरकारला धमकीच दिली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व ते स्वत: करणार आहेत. त्यामुळे राज्यभरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. राज्यभरातील टोलनाक्यांची मोडतोड, उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर, मनसेची मान्यताच रद्द करा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होणार आहे.