एक मच्छर’ने वाचविले शेकडो मुंबईकरांचे प्राण- भटकळचा खुलासा

मुंबई- मुंबईतील पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, एटीएस मुख्यालयासह तब्बल १४ गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोटांसाठी रेकी केली होती. मात्र, बॉम्बस्फोटांपूर्वी वकास नावाच्या दहशतवाद्याला डेंग्यूची लागण झाली आणि आमचा प्लॅन रद्द झाला, अशी खळबळजनक माहिती इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ याने दिली आहे.

पुढे इतरांच्या मदतीने कबुतरखाना, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले. याचबरोबर दादर रेल्वे स्टेशनजवळच्या फुल मार्केटजवळ नियमित उभी राहत असलेल्या पोलिस व्हॅनच्या खालीही बॉम्ब ठेवला होता. मात्र वेळेआधीच व्हॅन रवाना झाल्याने डाव फसला. त्यामुळे शेवटी ते बॉम्ब कचराकुंडीत टाकले व तेथून सटकलो अशीही कबुली भटकळ याने दिली आहे. त्यामुळे वकास नावाच्या अतिरेक्याला डेंग्यू झाला नसता तर हजारो नागरिकांचे प्राण गेले असते. मुंबईतील डासामुळे वकासला डेंग्यू झाला अन् हजारो मुंबईकरांचे प्राण वाचले असेही म्हणता येईल.

भटकळ आणि कंपनीने कुलाबा मार्केट, मुंबादेवी मंदिर, गोल देऊळ, दादर पूर्व आणि पश्चिमेकडील गर्दीची ठिकाणे, अंधेरी स्थानक, अंधेरीतील मॅकडॉनल्स मॉल, जोगेश्वरी स्थानक, जुहू चौपाटी आदी ठिकाणी रेकी केली होती. तसेच १३ जुलै रोजी साखळी पद्धतीने स्फोट करण्याचा कट रचला होता. मात्र त्यातील तीनच ठिकाणी स्फोट घडले. यासिक भटकळ त्यावेळी त्याच्या साथीदारांसह हबीब मंजील इमारतीत राहत होता. दादर येथील कबुतर खान्याजवळील बस स्टॉप स्फोटासाठी निश्चित करण्यात आला होता. त्याचवेळी फुलमार्केटजवळ सुरक्षेसाठी उभी राहणारी पोलिसांची गाडी बॉम्बस्फोटाने उडविण्याचा कट भटकळने आखला होता. यामुळे गाडीत असलेले व बाहेर उभे असलेले ८-१० पोलिस टार्गेट होते. मात्र बॉम्ब घेऊन जाण्यास उशीर झाला व हा कट फसला, अशी खळबळजनक माहिती एटीएसला त्याने दिली आहे.