नक्षलग्रस्त गावांना सौरउर्जेद्वारे वीजपुरवठा

भोपाळ – मध्य प्रदेशमधील 44 नक्षलग्रस्त गावांना सौरउर्जेद्वारे वीज पुरविण्याची महत्त्वाकांक्षी योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने आखली आहे. या योजनेद्वारे बालाघाट, शाहदोल, उमरिया, सिधी आणि सिंगरौली या जिल्ह्यांमधील गावांना वीजपुरवठा केला जाणार असून या योजनेसाठी 37.62 कोटी रुपये इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. राज्य उर्जा मंत्री राजेंद्र शुक्‍ला यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेल्याचे एका उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. नक्षलग्रस्त भागामध्ये पारंपारिक उर्जासाधनांच्या सहाय्याने वीजपुरवठा करणे अवघड असल्याने अपारंपारिक साधनांचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अपारंपारिक उर्जासाधनांच्या सहाय्याने वीजपुरवठा करण्यासंदर्भात केंद्राच्या ग्रामीण वीजपुरवठा आयोगाने योजना संमत केली आहे. या योजनेवर लवकरच काम सुरु होणार आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये इतरही अपारंपारिक उर्जासाधनांचा वापर करणे शक्‍य होणार आहे. या योजनेंतर्गत गावांमध्ये सौरउर्जेवर चालणारे पथदिवे उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर, प्रत्येक घरामध्ये एक 11 किंवा 18 वॅट सीएफल दिवा व 60 वॅट क्षमता असलेला पॉवर पॉईंट पुरविला जाणार आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण वीजपुरवठा आयोग 90% खर्च करणार असून उर्वरित 10% खर्च हा मध्य प्रदेश राज्य सरकार करणार आहे.