भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरु होणार ?

कराची – पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत पुन्हा क्रिकेट मालिका सुरु करण्यास भारताने अनुकूलता दाखवली आहे. भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी तयार आहेत असे पीसीबीचे अध्यक्ष झाका अशरफ यांनी सांगितले. भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरु व्हावी यासाठी श्रीनिवासन अत्यंत गंभीर आहेत. आमच्या पसंतीच्या त्रयस्थ ठिकाणी मालिका खेळवण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

श्रीनिवासन यांच्याकडून आम्हाला सध्या तोंडी आश्वासन मिळाले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये खात्रीलायक मालिका खेळवली जावी यासाठी आम्हाला लिखित आश्वासन हवे आहे असे अशरफ यांनी सांगितले. भारतामध्ये पाकिस्तानकडून सातत्याने होणा-या दहशतवादी कारवायांमुळे भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणे बंद केले आहे. आयसीसीच्या उत्पनामध्ये जास्त वाटा मिळावा यासाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताने एक प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला पाकिस्तान, श्रीलंकेने विरोध केल्यानंतर बीसीसीआयने त्रयस्थ ठिकाणी मालिकेचा प्रस्तावाला सकारात्मक संकेत दिले आहेत.

Leave a Comment