हैदराबाद – सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या मुळे सध्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल भलतीच खूष आहे. गेल्या काही दिवसांपासून हरवलेला सूर परत मिळवता आल्याने तिच्या खेळाबाबत ती आनंदी आहे. आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांची तयारी सुरू ठेवणार असून त्यासाठी फिटनेस राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत सायना नेहवाल यांनी व्यक्त केले.
फुलराणी सायना नेहवालने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूला मागे टाकत विजेतेपद आपल्या नावे केले. या स्पर्धेनंतर तिने गतवर्षीचा दुष्काळ संपवला. यावेळी बोलताना सायना नेहवाल म्हंणाली, सुपर सीरीजनंतर मी थोडे थांबण्याचा विचार केला. गतवर्षी झालेल्या दुखापती आणि आलेल्या अपयशांचा परिणाम भावी काळात होणार नाही. खराब फॉर्मची सावली पुढील काळात आपल्या कामगिरीवर दिसणार नाही.
आशियाई आणि राष्ट्रकुल खेळ पुढे असल्याने आपल्याला हा ब्रेक गरजेचाच होता. आता चार आठवड्यांचा ब्रेक मला चांगलाच कामी आला. आगामी काळात आपण फिटनेस राखण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यावरच आपली कामगिरी टिकून असेल. गेल्या वर्षीचा काळ माझ्यासाठी बराच त्रासदायक होता. पण याचा विचार मी भविष्यात करणार नसल्याचे सायना यानी यावेळी बोलताना स्पष्ट केले.