कर्नाटकचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज – भावे

मुंबई- आतापर्यंतच्या सामन्यात सांघिक व सातत्यपूर्ण कामगिरी हेच आमच्या संघाच्या यशाचे गमक आहे. आगामी काळात रणजी विजेतेपदासाठी कर्नाटकचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात रणजी विजेतेपदासाठी २९ जानेवारीपासून सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी महाराष्ट्राने सोमवारी सरावही केला. महाराष्ट्राच्या संघाला या रणजी स्पर्धेत २१ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याची संधी चालून आली आहे.

विजेतेपदाच्या संधीविषयी बोलताना भावे म्हणाले, यावर्षीच्या रणजी स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी सर्वच आघाडय़ांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत मुंबईला वानखेडेवर, उपांत्य फेरीत पश्चिम बंगालविरुद्ध इडन गार्डन्सवर पराभूत केले आहे. त्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. अर्थात अंतिम लढतीत कर्नाटकचे आव्हान मोठे आहे. त्यांना आम्ही कमी लेखत नाही. त्यांच्याकडेही अनुभवी फलंदाज व गोलंदाज आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत लढत देण्याची आमची तयारी आहे.

विजय झोलच्या समावेशाबाबत समाधान व्यक्त करीत भावे यांनी सांगितले. विजय हा अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. त्याने रणजी पदार्पणातच अतिशय चमकदार खेळ केला आहे. कर्णधार रोहित मोटवानी, केदार जाधव, हर्षद खडीवाले, संग्राम अतितकर यांच्यासह सात फलंदाजांनी यंदा सरासरी पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जाधवने यंदाच्या मोसमात एक हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. खडीवाले यानेही जवळजवळ तेवढय़ाच धावा केल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment