मुंबई- शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. रघुनाथदादा यांच्या प्रवेशामुळे आपला पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करण्याची चांगली संधी मिळणार आहे. दरम्यान, रघुनाथदादांनी प्रवेश करताना राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली. तसेच गेल्या 10 दहा वर्षात राज्य सरकारला साधा जाबही विचारण्याचे काम विरोधकांनी केले नसल्याचे सांगत राजू शेट्टी यांच्यावर कुरघोडी केली आहे. राजू शेट्टी यांनी महायुतीत प्रवेश केल्यानेच त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीतील एका नेत्याच्या सल्ल्यानेच रघुनाथदादा यांनी आपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे.
रघुनाथदादा पाटील यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी आपच्या नेत्या अंजली दमानिया उपस्थित होत्या. रघुनाथदादा यांनी सांगितले की, आमची शेतकरी संघटना गेल्या 20-25 वर्षापासून शेतक-यांची हितासाठी लढत आहे. याचबरोबर जेव्हा-जेव्हा ज्या पक्षांनी शेतक-याच्या हिताचे निर्णय घेऊ असे वचन देत जाहीरनाम्यात आमच्या मागण्याचा समावेश केला त्यांना त्या-त्यावेळी आम्ही राजकीय पाठिंबा जाहीर केला होता. गेल्या काळात आमच्या संघटनेने भाजप- शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र, प्रमुख विरोधक पक्ष राहिलेल्या युतीने राज्य सरकारला एकदाही जाब विचारला नाही. त्यामुळे राज्यात विरोधक आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे आम्ही यंदा नव्या व सामान्य लोकांना न्याय देणा-या आम आदमीपक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आम आदमी पक्ष सामान्य जनतेसाठी काम करीत असला तरी शेतक-यांच्या भूमिकेबाबत आम्ही राज्यस्तरीय नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. तसेच याबाबत समन्वयाने शेतकरी हिताचे धोरणाबाबत माहिती दिली जाईल. अंजली दमानिया यांनीही रघुनाथदादा यांचे पक्षात स्वागत करीत येत्या काळात चर्चा करून शेतकरी धोरणाबाबत अंतिम स्वरूप दिले जाईल.दरम्यान, राजू शेट्टी यांनी महायुतीत प्रवेश केल्यानेच राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्याच्या सल्ल्याने रघुनाथदादा पाटील यांनी आपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. तसेच आपच्या तिकीटावर ते हतकणंगलेतून लोकसभा लढविण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी हे महायुतीचे तेथे उमेदवार असतील. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून सध्या जयंत पाटील व कल्याणप्पा आवाडे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे रघुनाथदादा पाटील लोकसभेला उभे राहिल्यास ऊस दरावरून नाराज झालेले राजू शेट्टींचे समर्थक रघुनाथदादांकडे झुकण्याची शक्यता आहे. अशावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे.