
मुंबई : चार राज्यातल्या निवडणुकांच्या यशानं हूरळून न जाता व आगामी निवडणुकांत ‘आप’चे स्पर्धेत उतरण्यापेक्षा पाय जमिनीवर ठेवून कामाला लागावे असा मौलिक सल्लाव शिवसेनेने भाजपला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हैदराबादेत सध्या संघ परिवाराचे मंथन सुरू असून त्या मंथनात ‘आप’च्या यशावर बराच खल झाला. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला केजरीवाल टक्कर देत आहेत. कालपर्यंत मोदींची लोकप्रियता विनासायास होती. पण आता केजरीवाल आणि त्यांचा ‘आप’ मोदींच्या आडवा आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही उठतो व आपणच ‘आप’चे बाप असल्याची गर्जना ठोकतो. अशा शब्दात शिवसेनेनं मनसेवरही निशाणा साधला आहे. चार राज्यातल्या निवडणुकांच्या यशाने भाजपने हूरळून जाऊ नका हा सल्ला मोहन भागवतांनी दिला आहे. पण हा सल्ला केवळ भाजपसाठीच आहे असे नाही, तर तो काँग्रेसचा पराभव करू इच्छिणा-या सर्वासाठी आहे.
संघ परिवारानं बेभान झालेल्या वासरांना भानावर येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ‘आप’चं यश कमी लेखाल तर फसाल असा इशारा देत लाटेवर निवडणूका जिंकण्याचे दिवस गेले असाही इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.