नेपाळमध्ये अपघातात सहा भारतीयांचा मृत्यू

काठमांडू – नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कोलकतातील पर्यटकांची गाडी मंगळवारी रात्री नदीत कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी आज (बुधवार) दिलेल्या माहितीनुसार, पर्यटनस्थळ असलेल्या पोखरा येथून हे सर्वजण काठमांडूला जात होते. या मार्गावर असलेल्या बंडीपूर येथे मार्गस्यांगडी नदीत त्यांची गाडी कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूनेच वाहत असलेल्या ६० फुट खोल नदीत ती गाडी कोसळली.

अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये विनयकुमार त्रिपाठी (वय ५८), कलावंती त्रिपाठी (वय ५६), निलम त्रिपाठी (वय ३७), पूनम त्रिपाठी (वय ३३), नेहा त्रिपाठी (वय २०) आणि हेमंत त्रिपाठी (वय १३) या एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. पाच जखमींनी काठमांडूला उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यांचीही प्रकृती गंभीर आहे.