चंद्राबाबू नायडू यांची आजपासून प्रजा गर्जना यात्रा

हैदराबाद – देशातल्या प्रत्येक घोटाळ्याचा उगम कॉंग्रेसमध्येच आहे. असे असताना राहुल गांधी यांनी भ्रष्टाचारमुक्तीचा देवदूत बनण्याचा प्रयत्न करणे हे केवळ हास्यास्पदच आहे असे नाही तर जनतेची दिशाभूल करणारे आहे, असा घणाघाती आरोप तेलुगू देसमचे नेते, आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल तिरुपती येथे बोलताना केला. त्यांनी काल तिरुपतीपासून प्रजागर्जना यात्रा सुरू केली.

त्यांच्या या यात्रेमध्ये आंध्र प्रदेशातील कॉंग्रेस सरकारचे नागरी विकास मंत्री श्रीधरकृष्ण रेड्डी यांनी त्यांची भेट घेतली. श्री. रेड्डी हे नेल्लोरचे राहणारे आहेत. त्यांनी चंद्राबाबूंची भेट घेतल्यामुळे ते कॉंग्रेसचा त्याग करून तेलुगू देसममध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत.

राहुल गांधींनी देशातला भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या वल्गना करू नयेत, कारण त्यांचा स्वत:चा पक्षच भ्रष्टाचाराच्या शेकडो प्रकरणात अडकलेला आहे. असे म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांना आपले मेव्हणे रॉबर्ट वड्रा यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचे आव्हान दिले. आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या भ्रष्टाचाराबाबत राहुल गांधी एक शब्दही बोलत नाहीत याविषयी सुद्धा नायडू यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

Leave a Comment