‘आप’मध्ये मंत्रीपदावरून कलह?

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाने (आप) कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेतला असताना पक्षाच्या नेत्यांमध्ये मंत्रीपदावरून कलह सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रीपद न मिळाल्याने लक्ष्मीनगरचे आमदार विनोदकुमार बिन्नी हे पक्षावर नाराज झाले आहेत. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी सुरू झालेल्या बैठकीतून आमदार बिन्नी निघून गेले आहेत.

केजरीवाल यांच्या कॅबिनेटमध्ये कोणाचा समावेश असेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. ‘आप’च्या मंत्रिमंडळातील सहा नेत्यांची नावे निश्चित झाली आहेत. मात्र त्यात आमदार बिन्नी यांचे नाव नसल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले आहेत. बिन्नी यांनी शीला दीक्षित सरकारध्ये गेल्या 15 वर्षे मंत्री राहिलेले १अशोक वालिया यांचा पराभव केला होता.

दरम्‍यान, अरविंद केजरीवाल यांच्‍या मंत्रिमंडळातील नावे निश्चित झाली असून मनिष सिसोदिया, सोनाथ भारती, सौरभ भारद्वाज, सत्‍येंद्र जैन, राखी बिर्ला, गिरिश सोढी यांचा त्‍यात समावेश होणार आहे. हे सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री राहणार आहेत.