विजयापासून टीम इंडिया आठ विकेट दूर

जोहान्सबर्ग: जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेवर विजयासाठी शेवटच्यार दिवशी आठ गडी बाद करायचे आहेत. टीम इंडियाने शनिवारी दक्षिण अफ्र‍केपुढे विजयासाठी ४५८ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी चौथ्या दिवसअखेर दोन बाद १३८ धावांची मजल मारली आहे. त्यामुळे आता विजय इंडियाच्या टप्प़यात आला आहे.

पंचांनी चौथ्या दिवसाचा खेळ थांबवला, त्या वेळी अल्विरो पीटरसन ७६ आणि ड्यू प्लेसी १० धावांवर खेळत होते. दक्षिण आफ्रिकेने दुस-या डावात दमदार सुरुवात केली होती. अल्विरो पीटरसन आणि ग्रॅमी स्मिथ यांनी १०८ धावांची भागीदारी रचून यजमानांच्या डावाचा भक्कम पाया घातला. ती जोडी भारताला डोईजड ठरणार असं वाटत असतानाच, अजिंक्य रहाणेच्या अचूक थ्रोने कसोटीला कलाटणी दिली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्मिथ धावचीत झाला.

त्या नंतर दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का बसला तो हशिम अमलाच्या विकेटचा. मोहम्मद शमीचा चेंडू बाऊन्सर असेल म्हणून खाली बसलेल्या अमलाचा अंदाज इतका चुकला की, जेमतेम गुडघ्याइतक्या उडालेल्या त्या चेंडूने त्याच्या यष्टींचा वेध घेतला.दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटीत धोनीची टीम इंडिया विजयापासून आठ विकेट्स दूर आहे. दक्षिण आफ्रिकेला ही कसोटी जिंकायची तर यजमानांना पाचव्या दिवशी आणखी ३२० धावा कराव्या लागतील आणि ही कसोटी ड्रॉ करायची तर दक्षिण आफ्रिकेसमोर पाचवा दिवस खेळून काढण्याचे आव्हान आहे.

Leave a Comment