मुंबई – दलितांच्या घरात जेवण करून त्यांच्याविषयी खोटी सहानभूती राहुल गांधी दाखवत आहेत. त्यांना दलितांविषयी खरोखरच कळकळ वाटत असेल तर राहुल गांधींनी दलित कन्येशी विवाह करून दाखवावा असे आव्हान रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दिले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या युवामोर्चा संमेलनात बोलताना त्यांनी हे आव्हान दिले आहे.
अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठींबा जाहीर करणारे आठवले आज म्हणजे शनिवारी राळेगण सिद्धी येथे अण्णांची भेट घेणार आहेत. आमची सत्ता आली तर अण्णांचे जनलोकपाल बिल संमत करू असे त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी शिवशक्ती आणि भीमशक्तीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने सामील होण्यास आमची आडकाठी नाही मात्र जागावाटपाबाबत आम्ही कोणताही समझोता करणार नाही असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.