केंद्र सरकारवर जनतेचा अविश्वासच- ममता बॅनर्जी

नवी दिल्ली- पाच राज्यात झालेल्या निवडणूकीच्या माध्यमातून जनतेने केंद्र सरकारवर या अगोदरच अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे आगामी काळात संसदेमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची गरजच नाही, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी यूपीए सरकारवर केली.

आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस भारतीय जनता पक्ष किंवा कॉंग्रेस यापैकी कोणाबरोबरही आघाडी करणार नाही आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या सहा खासदारांनी यूपीए सरकारविरोधात अविश्वास ठराव सादर केला आहे. या ठरावाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न त्यांधना विचारला असता त्यांनी उत्तर देताना बॅनर्जी यांनी जनतेने अगोदरच केंद्र सरकारविरोधात अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे नव्याने अविश्वास ठराव मांडण्याची गरजच नाही, असे त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या दौ-यावर आलेल्या बॅनर्जी यांनी मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, लालकृष्ण अडवाणी आणि वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली. अविश्वासाचा ठराव मांडणा-या कॉंग्रेसच्या नेत्यांनीही बॅनर्जी यांची भेट घेऊन या ठरावाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

Leave a Comment