मोहन रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई – माजी खासदार आणि शिवसेनेचे नाराज नेते मोहन रावले यांनी आज सोमवारी शिवसेना नेतृत्वावर घणाघाती तोफ डागली आहे. शिवसेना हा आता फक्त दलालांचा पक्ष बनत चालला आहे आणि त्यासाठी केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर हेच जबाबदार असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला आहे. यानंतर रावले यांची टीका करणारी पत्रकार परिषद सुरू असतानाच, मोहन रावले यांना शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली.

शिवसेनेबद्दल याआधी अनेकदा व्यक्त केलेली नाराजी, काही दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेली राज ठाकरे यांची भेट आणि आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेवर केलेली सडाडून टीका या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने अत्यंत तातडीने कारवाई केली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान रावले म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला शिवसेना पक्ष हा नाहीच, असा दावाही त्यांनी केला.

1991 पासून सलग पाच वेळा शिवसेनेचे मुंबईतील खासदार असलेल्या मोहन रावले हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. अलीकडेच त्यांनी आपली नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आपण गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा करत आहोत., मात्र, आपल्याला भेटीची वेळ दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप केला. मिलिंद नार्वेकर यांच्यामुळेच पक्ष रसातळाला जात असल्याचा आरोपही त्यांनी नार्वेकरांचे नाव घेऊन केला आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्यामुळेच लाखो शिवसैनिक शिवसेनेपासून दुरावत असल्याचे सांगून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेने जमा झालेले आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आलेले लाखो शिवसैनिक आता दुरावत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच नार्वेकरांमुळे शिवसेना हा आता दलालांचा पक्ष बनत चालला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.

लाखो शिवसैनिक महत्त्वाचे आहेत की, एक मिलिंद नार्वेकर असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या स्थापनेपासून सोबत असलेले कित्येक शिवसैनिक नार्वेकरांपायी शिवसेना सोडून जात असतानाही नार्वेकरांची हकालपट्टी का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेना नेतृत्वाला आता लाखो शिवसैनिक नाही तर एक मिलिंद नार्वेकर पुरेसा असल्याचा आरोपही त्यांनी केला. मिलिंद नार्वेकर हेच शिवसेनेतील खरे अस्तनीचे निखारे आहेत, तेच शिवसेनेला संपवतील, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मिलिंद नार्वेकरांची हकालपट्टी करण्याची हिम्मत शिवसेना नेतृत्वात नाही, असा घणाघाती आरोपही मोहन रावले यांनी यावेळी केला.

Leave a Comment