दिल्ली – दिल्लीतील विधानसभा निवडणूकांत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धूसर दिसत असतानाच या दोन्हीही पक्षांशी हातमिळवणी करणार नाही असे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूकात आम्हाला बहुमत मिळाले नाही तरी आम्ही कोणत्याच पक्षासोबत जाणार नाही कारण असे करणे ही जनतेची फसवणूक ठरेल असे सांगून ते म्हणाले की आम्ही सत्तेवर नाही आलो तरी राजकारणात कायम राहणार आहोत.
काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी त्यांच्या पक्षाला बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त करताना गरज पडली तर आमचे दरवाजे सर्व पक्षांसाठी खुले आहेत अशी पुस्ती जोडली होती. त्यांचा रोख आम आदमी पार्टीकडेच होता .त्यावर केजरीवाल यांनी असे असेल तर भाजप व काँग्रेसने एकत्र यावे असा टोलाही लावला आहे.