नवी दिल्ली – क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये कमवणार्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न का आणि कशासाठी, असा सवाल जेडीयूचे खासदार शिवानंद तिवारी यांनी केला आहे. सचिनच्या अगोदर भारतरत्न मिळण्यासाठी देशात अनेक लोक पात्र होते, असे तिवारी म्हणाले.
यामध्ये त्यांनी हॉकीपटू मेजर ध्यानचंद आणि बिहारचे नेते कर्पूरी ठाकूर यांची नावे नमूद केली. सचिनने क्रिकेटमधून कोटींची संपत्ती मिळवली आहे. क्रिकेटमुळे देशातील अन्य खेळांचा नाश झाला आहे. मात्र तरीही क्रिकेटपटूला भारतरत्न दिला जातो, असे तिवारींनी म्हटले आहे.
नुकताच भारतरत्न जाहीर झालेले शास्त्रज्ञ सी एन आर राव यांनी राजकारण्यांना मूर्ख ठरवले आहे. त्यामुळेही शिवानंद तिवारींचा संताप झाला आहे. मात्र त्यांनी सचिनबाबत बोलून हा संताप व्यक्त केला आहे. क्रिकेटमधून कोट्यवधी कमावणार्यांना भारतरत्न का द्यायचा, असा प्रश्न उपस्थित करून हा पुरस्कारच रद्द करण्याची मागणी तिवारींनी केली आहे.