शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही – जयदेव

मुंबई – शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडली आहे. बाळासाहेब आणि शिवसैनिकांचे वेगळं नातं होतं. बाळासाहेब आजही शिवसैनिकांच्या हृदयात आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याची गरज नाही, अशी भूमिका जयदेव यांनी मांडली.

शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय कुणाचाही पुतळा नको, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्सवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही जयदेव यांनी नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. महालक्ष्मीवर कोणतेही उद्यान करण्यास जयदेव यांचा विरोध आहे. मुंबईत मोकळ्या जागा कमी आहेत. थीम पार्कमुळे रेसकोर्सवर आणखी एक बांधकाम होईल, असे जयदेव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव आणि राज या ठाकरे बंधुंवरही जयदेव यांनी भाष्य केले. दोघांमध्ये समन्वय साधण्याची गरज नाही. दोघांना हवे तेव्हा एकत्र येतील, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. तसेच दसरा मेळाव्यातील अपमाननाट्याला मनोहर जोशीच जबाबदार असल्याचा टोला जयदेव यांनी यावेळी हाणला. जयदेव यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी थीम पार्कला सरळ सरळ विरोध केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Comment