मुंबई- भारताने दुस-या कसोटीवर मजबूत पकड मिळवली असून, भारताचा एक गडी बाकी असून, भारताकडे 280 हून अधिक धावांची आघाडी आहे. चेतेश्वर पूजारापाठोपाठ रोहित शर्माने मालिकेत सलग दुसरे शतक झळकवले आहे. चेतेश्वर पूजाराचे शानदार शतक, सचिन तेंडुलकरच्या (74) धावा आणि विराट कोहलीचे (57) अर्धशतक यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर मोठी आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत, चेतेश्वर पूजाराने कसोटी कारर्कीदीतील पाचवे शतक झळकवले. पूजारा 113 धावांवर बाद झाला. शिलिंगफोर्डने त्याला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केले. ठराविक अंतराने भारताचा फलंदाज बाद होत असून, भारताचे आतापर्यंत सात गडी तंबूत परतले आहेत. रोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार ही जोडी मैदानावर आहे.
भारताचा डाव गडगडला असला तरी, भारताने वेस्ट इंडिजवर मोठी आघाडी घेतली आहे. सचिन बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या कोहलीने झटपट धावा जमवत अर्धशतक झळकवले. शिलिंगफोर्डने ही जोडी फोडली. शिलिंगफोर्डाने 57 धावांवर कोहलीला सॅमीकरवी झेलबाद केले.
त्याआधी क्रिकेटच्या खेळपट्टीवर पाय ठेवल्यापासून चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे वहात आलेल्या सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिज विरुध्दच्या कारकिर्दीतील अखेरच्या कसोटी सामन्यातही आपल्या लाखो चाहत्यांना निराश केले नाही. सचिनला शतक झळकवता आले नसले तरी, त्याने शानदार 74 धावा फटकावून काही प्रमाणात चाहत्यांचे समाधान केले.
सचिनच्या कारकिर्दीचा शेवट शानदार शतकाने होणार ? याचीच उत्सुक्ता सर्वांना लागून राहिली होती. मात्र 74 धावांवर देवनारायणच्या गोलंदाजीवर सचिन बाद झाला. सचिनने त्याच्या 74 धावांच्या खेळीत बारा चौकार लगावले. प्रसारमाध्यमांनी नेहमीप्रमाणेच या सामन्याला अति स्पेशल बनवले होते तरीही, याचे दडपण कुठेही सचिनच्या खेळात दिसले नाही.