कोलकाता – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निरोपाची मालिका असलेल्या भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 51 धावांनी शानदार विजय मिळवला. रोहित शर्मा, रविचंद्नन अश्विनची शानदार शतके आणि मोहोम्मद शामीची भेदक गोलंदाजी याच्या जोरावर भारताने विजय साकारला. भारताच्या 219 धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 168 धावात संपुष्टात आला. पदार्पणचा कसोटी सामना खेळणा-या रोहित शर्मा आणि मोहोम्मद शामी यांच्या कामगिरीमुळे भारताला डावाने विजय मिळवता आला. या विजयामुळे भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कारकीर्दीतील 199 वा आणि कोलकात्यात अखेरचा कसोटी सामना खेळणा-या सचिन तेंडुलकरचा इडन गार्डनवर कोलकाता क्रिकेट असोशिएशनकडून खास सत्कार करण्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सचिनला शाल आणि फेटा देऊन त्याचा गौरव केला. यावेळी सचिनचे छायाचित्र असलेले फुगे आकाशात सोडण्यात आले. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या निवृत्तीचे क्षण डोळयात साठवून घेण्यासाठी यावेळी इडन गार्डनवर प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
दुस-या डावात शामीने विंडिजचा निम्मा संघ गारद केला. दुस-या डावात विंडिजच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी मजल मारता आली नाही. शामीने सर्वाधिक पाच गडी बाद केले. भारताच्या भेदक मा-यासमोर वेस्टइंडिजचे फलंदाज एकापोठएक बाद होत गेले. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही मोहोम्मद शामीच्या गोलंदाजीसमोर विडिंजच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
ख्रिस गेलच्या रुपाने वेस्टइंडिजला पहिला धक्का बसला. ख्रिस गेलला 33 धावांवर भुवनेश्वर कुमारने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. त्यानंतर पॉवेल, ब्राव्हो, सॅम्युलस अनुक्रमे 36,37 आणि चार धावांवर बाद झाले. पॉवेल आणि ब्राव्होला अश्विनने बाद केले. सॅम्युल आणि रामदीन शामीचे बळी ठरले. अश्विनने तीन आणि भुवनेश्वरकुमारने एकगडी बाद केला आहे.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात दीडशतकी खेळी करणारा रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर 219 धावांची भक्कम आघाडी मिळवली . शुक्रवारी सकाळी तिस-या दिवशी उपहारापूर्वी भारताचा डाव 453 धावांवर संपुष्टात आला. रोहित आणि अश्विन पाठोपाठ बाद झाल्यानंतर वेस्टइंडिजने भारताच्या शेपटाला लगेच गुंडाळले. गुरुवारी भारताची आघाडीची फळी गुंडाळणा-या शिलिंगफोर्डने वेस्टइंडिजकडून सर्वाधिक सहागडी बाद केले. पेरामॉलने दोन गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. शुक्रवारी सकाळी खेळाला सुरुवात झाल्यानंतर काल 92 धावांवर नाबाद असणा-या अश्विनने शतक झळकवले पाठोपाठ रोहितने दीडशतक पूर्ण केले. रोहित शर्मा 177 धावांवर बाद झाला आहे. पेरमॉलने त्याला पायचीत केले. त्या पाठोपाठ आर. अश्विनही 124 धावांवर बाद झाला. अश्विन शिलिंगफोर्डचा बळी ठरला. शिलिंगफोर्डने 124 धावांवर अश्विनच्या यष्टया वाकवल्या. संकटमोचक बनून भारतीय संघाच्या मदतीला धावून आलेल्या रोहित-अश्विनने अडचणीत सापडलेला भारताचा डावच सावरला नाही तर, भारताला वेस्ट इंडिजवर व्दिशतकी आघाडी मिळवून दिली.