नवी दिल्ली – निजामाच्या हैदराबाद संस्थान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर धोरणामुळे भारतात विलीन होऊ शकले. त्याच्या बाबतीत नेहरूंनी कचखाऊ भूमिका घेतली होती. एवढेच नव्हे तर या संस्थानाबाबत कणखर भूमिका घेणार्या सरदार पटेलांना जातीयवादी म्हणून हिणवले होते. ही गोष्ट लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये उघड केलेली आहेच. त्याच्या पाठोपाठ आता अडवाणी यांनी काश्मीरच्या बाबतीत सुद्धा नेहरूंनी कचखाऊ भूमिका घेतली होती, असा नवा गौप्यस्ङ्गोट केला आहे.
हैदराबाद संस्थानाबाबत आणि काश्मीरबाबत अडवाणी यांनी केलेल्या नेहरूवरील आरोपांचे स्पष्ट पुरावे सादर केले आहेत. १९४८ साली पाकिस्तानच्या सैनिकांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली. ती करताना अनेक पाकिस्तानी जवान नागरिक असल्याची बतावणी करून आदिवासींच्या वेषात आलेले होते. शिवाय जे खरेखुरे आदिवासी घुसले होते त्यांना या सैनिकांनी मदत केली होती.
ही घुसखोरी करणार्या पाकिस्तानींना हुसकावून लावले पाहिजे आणि त्यासाठी भारतीय सैन्य काश्मीरमध्ये घुसवले पाहिजे, असा आग्रह सरदार पटेल यांनी धरला. परंतु पंडित नेहरू त्यास तयार नव्हते. त्यांचे धोरण राबवले असते तर पूर्णच काश्मीर पाकिस्तानात गेला असता. परंतु सरदार पटेल यांनी सैन्य घुसविण्याचा आग्रह धरला. त्यामुळे दोन तृतीयांश काश्मीर तरी भारताच्या हाती लागला. एक तृतीयांश काश्मीर मात्र नेहरूंच्या धोरणामुळे पाकिस्तानकडे गेला.
या संबंधात नेहरू आणि पटेल यांच्यात जो वाद झाला त्यावेळी जनरल माणेकशा हे उपस्थित होते आणि त्यांनीच ही हकीकत प्रेमनाथ झा या पत्रकाराला सांगितली. त्यावेळी माणेकशा कर्नल होते. नंतर ते लष्करप्रमुख झाले आणि त्यावेळी त्यांनी ही मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पटेल आणि नेहरू यांच्यातला वाद नमूद करण्यात आला आहे. तो या मुलाखतीत आलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नेहरू आणि पटेल यांच्यात कसे मतभेद होते हे दाखवून दिले आहे.