नारायण साई मुंबईत?

मुंबई – अध्यात्मिक गुरू नारायण साई मुंबईत आश्रयास येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली असून तो मुंबईत आलाच तर त्वरीत त्याला पकडता यावे यासाठी विशेष मोहिम आखली गेली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लैगिंक अत्याचार, बलात्कार अशा आरोपांमुळे बदनाम झालेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याच आरोपांसाठी पोलिसांना हवा आहे मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. देशभरातील विविध १७ ठिकाणांवर त्याच्या शोधासाठी गुजराथ, हरियाना व अन्य राज्यातील पोलिस पथकांनी छापे टाकले आहेत मात्र त्याचा तपास लागू शकलेला नाही.

मुंबई पोलिसांना मिळालेल्या खबरीनुसार नारायण साई पश्चिम बोरिवलीतील गेस्ट हाऊसमध्ये आश्रय घेणार आहे. मात्र या ठिकाणाशिवाय मुंबईतील अन्य कांही ठिकाणीही तो लपण्याची शक्यता पोलिसांनी गृहित धरून संबंधित जागांवर पाळत ठेवली  असल्याचे समजते. बोरिवली भागात आसाराम आणि नारायण यांचे भक्तगण प्रचंड संख्येन आहेत, ते नारायण साईला स्वतःच्या घरातही लपवू शकतात असाही पोलिसांचा कयास आहे. नारायण साईने वेशांतर व रूपांतरही केले असावे असेही पोलिसांनी गृहित धरून त्या दृष्टीनेही तपास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलिस अधिकार्‍याकडून समजते.मात्र ही कारवाई इतकी गुप्त ठेवली गेली आहे की या कामगिरीत सामील असलेल्या पोलिसांच्या अन्य सहकार्‍यानाही त्याबद्दल कांही माहिती दिली गेलेली नाही.

मात्र उपायुक्त महेश पाटील यांनी अशा प्रकारे कोणतीही कारवाई सुरू नसल्याचे व नारायण साईसाठी अन्य कोणत्याही राज्यांकडून मदत मागितली नसल्याचे सांगितले आहे. नारायण साईवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस पथके तैनात केल्याचाही त्यांनी इन्कार केला आहे.

Leave a Comment