नवी दिल्ली – मोबाईल फोनच्या अर्थकारणातून भारतात २०२० साली ४० हजार कोटी डॉलर्स एवढी प्रचंड उलाढाल अपेक्षित असून त्यातून ४१ लाख लोकांना नोकर्या उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. जगभरातल्या मोबाईलफोनच्या व्यापाराचा अंदाज घेणार्या जीएसएमए या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये ही गोष्ट आढळली आहे. या फोनच्या अर्थकारणातून भारतात ९ अब्ज डॉलर्स एवढी पायाभूत सोयीतली गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. मोबाईल इकॉनॉमी इंडिया २०१३ या शीर्षकाच्या या अहवालात मोबाईल उद्योगामुळे भारताच्या अर्थकारणाला कशी गती येईल हे दाखवून देण्यात आले.
२०१२ साली भारतात मोबाईल इंडस्ट्रीने वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.३ टक्के एवढा वाटा उचलला आणि ७ लाख ३० हजार नोकर्या निर्माण केल्या. त्याशिवाय या अर्थकारणातून २० लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला, अशी माहिती जीएसएमएच्या सरसंचालक ऍनी बावेरोट यांनी दिली. भारत सरकारच्या काही धोरणांमुळे सध्या या क्षेत्राचा विकास काहीसा कुंठीत झाला असला तरी आगामी सात वर्षात तो वेगाने होईल अशी आशा बावेरोट यांनी व्यक्त केली.
भारतात या क्षेत्रात विकास व्हायचा असेल तर अधिक क्षमतेच्या रेडिओ वेव्हज्च्या वापराची अनुमती दिली गेली पाहिजे. तशी ती दिली तरच देशाच्या ग्रामीण भागामध्ये मोबाईल ङ्गोनचा विस्तार होऊ शकणार आहे आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे असे बावेरोट म्हणाल्या.