उन्नाव – उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातील कथित खजान्याच्या शोधार्थ सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवला आहे. राजा राम बख्श सिंह यांच्या किल्यातील परिसरात आजही एक हजार टन सोनं मिळवण्यासाठी खोदकाम सुरू आहे.
एएसआय’च्या देखरेखीखाली डौडियाखेडा गावात स्थित असलेल्या या किल्ल्यात आत्तापर्यंत पावणे चार फूट खोलपर्यंत खोदलं गेलंय. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात आज एका जनहित याचिकेवर सुनावणी पार पडली. डौंडिया गावात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय)कडून केल्या जाणार्या खोदकामावर नजर ठेवण्याचा आग्रह या याचिकेत करण्यात आला होता.
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशातल्या उन्नाव गावात सोन्याच्या शोधार्थ सुरु असलेल्या या खोदकाम प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, एएसआयला आत्तापर्यंत या खोदकामात जवळजवळ एक डझन पुरातन वस्तू मिळाल्यात. या खोदकामात आत्तापर्यंत वीटा, काही भाडी आणि इतरही काही वस्तू मिळाल्यात. 18 ऑक्टोबरपासून सरू झालेल्या हे खोदकाम पहिल्या दिवशी 15 सेंटीमीटर, दुसर्या दिवशी 55 सेंटीमीटर तसंच तीसर्या दिवशी 32 सेंटीमीटर खोल गेलं होतं. सोनं न मिळाल्यानं खोदकाम बंद करण्यात आलंय, अशी आवईही काल उठवली गेली होती. खोदकाम सुरू असलेल्या स्थळावर मीडियाला प्रतिबंध करण्यात आला आहे.
दरम्यान, ग्राम प्रधान अजयपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार 102 सेंटीमीटर खोल खोदल्यानंतर यामध्ये रविवारी एक भिंत मिळालीय. या भिंतीला सुरक्षित ठेवण्यासाठी खोदकाम हळुवाररित्या पण सुरुच आहे. पुरातत्ववाद्यांनी 18 ऑक्टोबरपासून खोदकाम सुरू केलंय. साधू शोभन सरकार यांनी पाहिलेल्या स्वप्नाच्या आधारावर 19 व्या शतकातील किल्ल्याच्या आतल्या भागात हे खोदकाम सुरू आहे. साधूनं, आपल्या स्वप्नात राजानं येऊन किल्ल्याच्या आतमध्ये एक हजार टन सोनं असल्याचं म्हटल्याचा दावा केलाय. त्यानंतर हे खोदकाम सुरू करण्यात आले आहे.