रिलायन्सच्या उलाढालीने पार केला १ लाख कोटींचा टप्पा

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीज ने २०१३-१४ च्या आर्थिक वर्षातील दुसर्‍या तिमाहीत व्यवसायाचा १ लाख कोटी रूपयांचा टप्पा पार केला असून ही उलाढाल १४.२ टक्कयांनी वाढून १,०६,५२३ कोटींवर पोहोचली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल करणारी देशातील ही पहिली कंपनी ठरली आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात कंपनीचा नफा १.५ टक्कयांनी वाढला आणि तो ५४९० कोटी रूपयांवर गेला आहे. गतवर्षी हा नफा ५४०९ कोटी रूपये इतका होता.

कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की देशात आर्थिक मंदीचे वारे असूनही रिलायन्सचे निकाल उत्साहवर्धक आहेत. कंपनीने रिफायनिग तसेच पेट्रो केमिकल व्यवसाय विक्रीत वाढ नोंदविली आहे तसेच रूपयाच्या अवमूल्यनाचा फायदा कंपनीला घटलेल्या गॅस उत्पादनातून होत असलेला तोटा कमी करण्यात झाला आहे. सोमवारी रिलायन्स शेअरचे दरही वधारले होते.