राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसचा प्रवास महागणार

नवी दिल्ली – राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात दोन टक्क्यांनी वाढ करून आठवडाही उलटला नसताना शुक्रवारी पुन्हा एकदा राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या गाड्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. येत्या 17 ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 25 ते 27 रुपयांची ही भाडे वाढ असणार आहे. या गाड्यांच्या सर्व प्रकाराच्या श्रेणींसाठी ही दरवाढ असणार आहे.

या रेल्वेमध्ये देण्यात येणार्‍या खानपान सेवेच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ही भाववाढ करण्यात आली आहे. या गाड्यांच्या प्राथमिक प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. केवळ खानपान सेवेच्या दरात वाढ झाल्यामुळे अंतिम तिकीटामध्ये 25 ते 27 रुपयांनी वाढ होणार आहे. या गाड्यांमध्ये केटरिंगची सुविधा देणार्‍यांना गेल्या 14 वर्षांपासून कोणतीही दरवाढ देण्यात आलेली नसल्याने ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे समजते