सचिनची 200 वी कसोटी होणार वानखेडेवर

नवी दिल्ली- सचिन तेंडुलकरची विक्रमी 200वी कसोटी वानखेडे स्टेडियमवर होईल. दस्तुरखुद सचिनने बीसीसीआयला तशी विनंती केल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशचे (एमसीए) अध्यक्ष रवी सावंत यांनी शुक्रवारी केली. मात्र याबाबत मंगळवारी अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सचिनची 200वी कसोटी कोठे होणार याबद्दल चर्चा सुरु होती. अखेर घरच्या मैदानावरच होणार असल्याने सचिनच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मास्टर-ब्लास्टरच्या इच्छेसाठी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरी कसोटी वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेतला दुसरा सामना सचिनच्या कारकीर्दीतील दोनशेवा आणि अखेरचा सामना असणार आहे.  हा सामना मुंबईतच खेळवला जाईल अशी माहिती बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिली आहे.  बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांच्यात यासंदर्भात चर्चा झली. 14 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपल्या बॅटच्या नजाकतीने अवघ्या क्रिकेटविश्वाला वेड लावणार्‍या सचिनचे चाहते जगभरात आहेत. पण मुंबई आणि सचिनचं नात काही औरच. मुंबईच्या मातीततच सचिनने क्रिकेटचे धडे गिरवले, नाव कमावलं. लहानसा फ्लॅट ते स्वत:चा अलिशान बंगला असा प्रवास केला. त्यामुळे याच मुंबईत आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळावा ही सचिनची इच्छा असणं स्वाभाविकंच म्हणायला हवं. सचिनची बॅट शेवटची मैदानात फिरताना पाहाण्यासाठी चाहते जितके उत्सुक असतील तितकेच मुंबईकर हळवे असतील.