मुंबईकडे चँपियन्स लीग टी-20 चषक

नवी दिल्ली- आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने यंदाची चँपियन्स लीग टी-20 स्पर्धा जिंकली. फिरोजशा कोटला मैदानावर झालेल्या अंतिम फेरीत रविवारी त्यांनी राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव केला. मुंबईचे हे दुसरे चँपियन्स लीग जेतेपद आहे.

यापूर्वी 2011 मध्ये त्यांनी पहिल्यांदा या स्पर्धेवर नाव कोरले. आयपीएलपाठोपाठ चँपियन्स लीग जिंकणारा मुंबई पहिला संघ ठरला. यंदा जेतेपद पटकावत रोहित शर्मा आणि सहकार्‍यांनी विक्रमवीर सचिन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सतर्फे विजयी निरोप दिला.

दोनशेहून अधिक धावा केलेल्या मुंबईचा पूर्वार्धातच विजय नक्की झाला होता. राजस्थानकडून कडवी झुंज अपेक्षित होती. अपयशी सलामीनंतर फॉर्मात असलेला मुंबईकर अजिंक्य रहाणे (47 चेंडूंत 65 धावा) आणि संजू सॅमसनने (33 चेंडूंत 60 धावा) दुस-या विकेटसाठी 67 चेंडूंत 109 धावांची झटपट भागीदारी केल्याने सामना रंगतदार होईल, असे वाटले. मात्र ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर मधली फळी कोसळली. मुंबईच्या 203 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला 18.5 षटकांत 169 धावाच करता आल्या. मुंबईतर्फे ऑफस्पिनर हरभजन सिंग (4 विकेट) आणि कीरॉन पोलार्डने (3 विकेट) प्रभावी मारा केला.

तत्पूर्वी, ड्वायेन स्मिथसह (39 चेंडूंत 44 धावा), ग्लेन मॅक्सवेल (14 चेंडूंत 37 धावा), कर्णधार रोहित शर्माच्या (14 चेंडूंत 33 धावा) फटकेबाजीमुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सहा बाद 202 धावा केल्या.

शेवटच्या आठ षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी 121 धावा कुटल्या. सचिन तेंडुलकरला त्याच्या कारकीर्दीतील शेवटच्या टी 20 डावात अवघ्या 15 धावा करता आल्या. राजस्थानतर्फे लेगस्पिनर प्रवीण तांबेने (19-2) अचूक मारा केला.

सहाव्या मोसमात सचिनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे चँपियन्स लीग ही त्याच्या कारकीर्दीतील शेवटची टी-20 स्पर्धा होती. सचिनला विजयी निरोप देण्याचा निर्धार मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंनी केला होता. त्यात त्यांना यश आले. प्रतिस्पर्धी कर्णधार राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडचीही ही शेवटची टी-20 लीग होती. मात्र संघाला चँपियन्स लीग जिंकून देण्यात त्याला अपयश आले.