नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून ‘बीसीसीआय’ व ‘आयपीएल’ संबधीत वेगवेगळे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. ‘बीसीसीआय’मध्ये काहीतरी मोठी गडबड सुरू असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले. एन. श्रीनिवासन यांनी ‘बीसीसीआय’चे कामकाज पाहताना ‘आयपीएल’शी संबंधित कोणत्याच विषयात ढवळाढवळ करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. श्रीनिवासन यांच्याबाबतच निर्णय ७ ऑक्टोबरला घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
बिहार क्रिकेट बोर्डाने (कॅब) यासंदर्भात श्रीनिवासन यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आयपीएलमधील गैरप्रकाराची चौकशी ‘बीसीसीआय’ने न करता अन्य तटस्थ व्यक्ती-संस्थेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या पार्श्व भूमीवर ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणी अरुण जेटली व विवेक गुप्ता यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीमध्ये श्रीनिवासन हे हस्तक्षेप करणार नाहीत, तसेच ‘आयपीएल’संदर्भातील सर्व बाबींपासून ते दूर राहतील, अशी ग्वाही ‘बीसीसीआय’च्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
देशातील क्रिकेट मंडळांची शिखर संस्था असलेल्या ‘बीसीसीआय’च्या कारभारावरही न्यायालयाने सडकून टीका केली. याप्रकरणी पुढील सुनावणी आता ७ ऑक्टोबरला होणार आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात जावई गुरूनाथ मय्यप्पन यांचाही हात असल्याने एन. श्रीनिवासन अडचणीत आले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून क्लिन चिट मिळत नाही तोपर्यंत श्रीनिवासन यांना ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळता येणार नाही.