नवी दिल्ली- उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयात बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या मृत्यूचा दाखला येत्या दोन-तीन महिन्यात देण्यात येइल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. बेपत्तांची वाट बघण्यात सात वर्ष थांबले जाणार नाही, त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
उत्तराखंडमधील बेपत्तांचा दोन महिन्यात मृत्यूचा दाखला- शिंदे
लोकसभेत १९३ या नियमांतर्गत उत्तरांखड प्रलयाबाबत झालेल्या विशेष चर्चेदरम्यान गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले, ‘उत्तराखंड सरकार आणि स्थानिक पोलीस बेपत्ता नागरिकांच्या पुष्टीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतायेत. ती प्रक्रिया झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांच्या आत बेपत्तांच्या मृत्यूचा दाखला दिला जाईल.’
गृहराज्य मंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन म्हणाले, या प्रलयात ५ हजार ३५९ नागरिक बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रलयात बेपत्ता झालेल्या नागरिकांची माहिती संबंधीत राज्यांकडून आलेली आहे. त्यानुसारच ही प्रक्रिया पुढे सुरू आहे. बेपत्ता नागरिकांच्या नावांबाबत सर्व प्रक्रिया आणि शोध पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये भरपाई देण्यात येईल.