अन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ

नवी दिल्ली – युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचे शिवसेना खासदार अनंत गिते यांनी जाहीर केले आहे. या विधेयकामध्ये अनेक त्रुटी असून त्या दुरूस्त झाल्यानंतर पाठिंबा देऊ, असे खासदार राऊत म्हणाले आहेत.

गेली वर्षं युपीए शासन असताना काँग्रेसने जनतेसाठी काही केले नाही. मात्र निवडणूक जवळ येताच अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करून घेणे, हा गरीबांविषयीचा कळवळा नसून राजकीय डाव आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे. अन्न सुरक्षा कायद्याचा अध्यादेशावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. आज या कायद्याच्या अध्यादेशावर मतदान घेण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कायद्यावर युक्तीवाद केला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी अन्न सुरक्षा कायद्याचा अध्यादेश कोणत्याही किमतीवर काढण्यात येणार असून लवकरच विधेयकही पारित करण्यात येणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर अन्न सुरक्षा कायद्याला भाजपचा पाठिंबा आहे. मात्र सरकार ने विधेयक आणून चर्चा कऱण्याची मागणी भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी केली.

सरकार केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अध्यादेश काढत असल्याची टीका त्यांनी केली. तर या कायद्यामुळे शेतकर्‍यांची अडचण होणार असून त्यांच्या मालाच्या हमीभावाबाबत कायद्यात उल्लेख नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला.

Leave a Comment