पन्हाळा गड


पन्हाळा हे महाराष्ट्रातील छोटेसे गाव – नगरपरिषद असलेले हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक वैचारिक व पराक्रमी आठवणींचे साक्षीदार आहे ते इथे असलेल्या पन्हाळा ह्या गिरिदुर्गामुळे. दक्षिण महाराष्ट्रातील अंबाबाईच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरपासून १८ किमीवर वसलेले पन्हाळा हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून अंदाजे ३१७७ मीटर उंचीवर आहे. या हिल स्टेशनला जायचे ते मुक्त वारा अनुभवण्यासाठी तसेच आपल्या शिवाजीराजांचा पन्हाळा गड पाहण्यासाठी.

पन्हाळ्याचा बांधकामाचा इतिहास:
इतिहासातील नोंदीनुसार ११७८ ते १२०९ या काळात या गडाचे बांधकाम शिलाहार भोज दुसरा यांनी केले आहे. त्यानंतर हा गड यादवांकडे आला. १६ व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीने तो आणखी बळकट केला. शिवाजीराजांनी १६५९ मध्ये या गडावर हल्ला करून त्यावर १६७३ पर्यंत आपली मालकी कायम ठेवली होती. याच गडाला अफझलखानानेही वेढा घातला होता मात्र आपल्या शूरमावळ्यांनी तो उठवून लावला. संभाजीराजांना सुद्धा याच गडावर कैदेत ठेवले गेले होते व नंतर येथून सुटका करून घेऊन ते परत शिवाजीराजांकडे आले. शिवाजीराजांच्या काळात या गडावर १५ हजार घोडे, २० हजार सैनिक तैनात असत. १४ कि.मी. च्या परिसरात पसरलेल्या या गडाला ११० माच्या आहेत. अनेक भुयारी मार्ग असलेल्या या गडाचे बांधकाम विजापुरी पद्धतीचे असून मोरांची शिल्पे येथे जशी दिसतात तशीच भोज राजाच्या काळातील कमळाची शिल्पेही दिसून येतात. गडाची तटबंदी ७ कि.मी. लांबीची आहे. सह्याद्रीच्या कडेखांद्यावर असलेला हा गड दख्खन पठारावरील सर्वात मोठा गड आहे.

पन्हाळ्यावरील ऐतिहासिक घटना:
पन्हाळ्याचा थेट संबंध शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या शूर सरदारांच्या ऐतिहासिक घटनांशी निगडित आहे. विजापूरच्या आदिलशाही बळकट वेढ्यात शिवाजीराजांनी सुमारे ५०० दिवस या पन्हाळा किल्यात काढले होते त्याचबरोबर सिद्दी जोहरला अतिशय हुषारीने चकवा देऊन महाराजांनी विशाळगड गाठला होता. महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत सिद्धी जोहरला अडवून ठेवल्यामुळे शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहचू शकले. घोडखिंडीतील या लढाईत बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले आणि ती जमीन त्यांच्या रक्ताने पावन झाली आणि म्हणूनच तिला आता पावनखिंड या नावाने ओळखले जाते. १६७३ मध्ये पन्हाळा गड शिवाजी महाराजांना मिळवून देण्यासाठी कोंडाजी फर्जंद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा गड जिंकून दिला होता. १७८२ साली पन्हाळा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती त्यानंतर १८२७ मध्ये तेथे ब्रिटीशांनी आपले ठाणे उभे केले.

पाराशर गुहा व गांधारबावडी – किल्ल्याचे पौराणिक आकर्षण:
महर्षी पाराशर या गडावरील गुहांमध्ये निवास करत असे सांगितले जाते आणि म्हणूनच या गुहांना पाराशर गुहा असे म्हटले जाते. करवीर पुराणात यांचा उल्लेख पन्नगालय म्हणजे सर्पांचे निवासस्थान असा येतो. महाराष्ट्राचे आद्यकवी मोरोपंत यांनी येथेच त्यांचे काव्यलेखन केले असेही सांगितले जाते.

गांधारबावडी ही वैशिष्ठ्यपूर्ण विहीर येथे पाहायला मिळते. किल्ल्याला वेढा पडला की पाण्यात पहिले विष कालवले जायचे. मात्र या तीन मजली विहिरीतील पाण्याचे स्त्रोत पाण्याची कमतरता भासू देत नसत. या विहिरीच्या भिंती इतक्या रूंद की सैनिक तेथे आरामात मुक्काम करू शकत तसेच येथील भुयारातून किल्ल्याबाहेरही पडू शकत. किल्ल्यातला किल्ला अशीच या बावडीची ओळख. अगदी मुख्य किल्ला पडला तरी येथे आश्रय घेता येत असे.
पन्हाळगडावर आवर्जून पाहावीत अशी ठिकाणे:

  • धर्मकोठी
  • राजवाडा
  • सज्जा कोठी
  • राजदिंडी
  • अंबरखाना
  • सोमाळे तलाव
  • चार दरवाजा
  • रेडे महाल
  • रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी
  • तीन दरवाजा
  • सोमेश्वर, अंबाबाई, महाकाली मंदिरे


बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा
कलावंती महाल, रंगमहाल, अंबरखाना यासारखी सुद्धा अनेक ठिकाणे पूर्वी अस्तित्वात होती परंतु कालांतराने त्यांची पडझड झाल्याने ती आता फक्त माहितीपुरती उरलेली आहेत.

पन्हाळा गड हा भ्रमंती किंवा प्रवास करण्यास योग्य आहे का?
दुर्गभ्रमंती (trekking) च्या दृष्टीने पन्हाळा हा गड अतिशय सोपा समजला जातो. या गडावर पोहचण्यासाठी कोल्हापूरपासून सतत बससेवा उपलब्ध आहेत. खाजगी वाहनाने देखील तुम्ही या गडावर पोहचू शकता. पन्हाळा हे हिल-स्टेशन असल्यामुळे गडाच्या सभोवताली निवासाच्या चांगल्या सोयी आहेत तसेच कोल्हापूरचे खास पदार्थ चाखण्याची व्यवस्थाही उत्तम आहे. या किल्ल्यावर बारमाही पिण्याची सोय असल्याने कोणत्याही ऋतूत तुम्ही या गडाला भेट देऊ शकता.